Ads (728x90)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष निर्भेळ यश संपादन करेल: अशोक चव्हाण मुंबई, दि. 21 सप्टेंबर, 2016: राज्यातील भाजप-शिवसेना प्रणित देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे अपयश उघडे झाले असून राज्यातल्या जनतेचा तीव्र असंतोष पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. राज्यातील 26 जिल्ह्यातल्या सुमारे 214नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकांच्या नियोजना संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्यालयात आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार या  निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप करत असून जाणीवपूर्वक संभ्रमावस्था ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेऊनही याबाबत सरकारकडून निवडणुक आयोगाला अंधारात ठेवण्याचे काम होत आहे. पंरतु काँग्रेस पक्ष एकदिलाने या निवडणुका लढेल आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेते जोमाने निवडणुकीला सामोरे जातील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. मराठा आणि मुस्लीम आरक्षणा संदर्भात राज्य सरकार जाणीवपूर्वक चालढकल करीत आहे.त्याचबरोबर दलित समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एट्रोसिटी कायदा रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसचा तीव्र विरोध राहील, असे सांगताना चव्हाण यांनी या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनातर्फे त्याचा दुरुपयोग होऊ नये याकरिता उपाययोजना कराव्यात असे म्हटले आहे. याबरोबरच राज्याचे माजी मुख्यमंत्री सहकारमहर्षी कै. वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष 13 नोव्हेंबर,2016 पासून काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात भव्यदिव्य पध्दतीने साजरे करण्यात येणार आहे,असे चव्हाण म्हणाले. या बैठकीत सदर निवडणुका संदर्भात कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठकांचे नियोजन त्याचबरोबर निवडणुकांच्या नियोजनाच्या संदर्भात समग्र चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेराधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम,शरद रणपिसे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, रणजित कांबळे, मधुकर चव्हाण, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, आ. भाई जगताप,माजी मंत्री राजेंद्र मूळक, आ. सतेज पाटील, आ. डी. पी. सावंत आदी उपस्थित होते.  

Post a Comment

Blogger